०८ ऑगस्ट, २०११

आगामी कादंबरीतून..

छान शिकवण्यात कुलकर्णी मॅडम एक नंबर होत्या. मॅडम नेहमी म्हणायच्या," अरे बाबांनो, तुमचं दुर्दैव, की मराठीचा अभ्यासक्रम बदलला. आता तुम्हाला मराठीची गोडी वाटावी, भाषा शिकण्याची आवड निर्माण व्हावी असा अभ्यासक्रम निवडायच्या ऎवजी बहुदा जातीपाती अन लेखक पाहून अभ्यासक्रम ठरवला जातोय.आमच्या वेळेला एक बालविराची कविता होती.
’खबरदार जर टाच मारूनी जाल पुढे चिंधड्या, ऊडवील राई राई एवढ्या.’
किंवा
रंगरंगुल्या सानसानुल्या
गवतफ़ुला रे गवतफ़ुला
असा कसा रे मला लागला
सांग तुझा रे तुझा लळा.
अशा कविता होत्या.
आत्ताच्या तुमच्या कविता अन धडे वाचले की आमच्याच पोटात गोळा ऊठतो. तुम्हाला म्हणूनच मराठी अवघड वाटते. ब-याच मंडळींना तर मराठी आवडत नाही."
मॅडम असं छान छान बोलायच्या. त्यांच्याकडून कविता ऎकायलाही मजा यायची. त्या कविता आता का नाहीत? आम्हाला त्या वाचायला त्या कुठे मिळतील? असे प्रश्न पडायचे.
मॅडमनी एकदा एक कविता ऎकवली होती. मला खूप आवडली होती ती कविता! आमच्या वर्गातला अर्जुन तर ती कविता छान सुरात गायचा!
या झोपडीत माझ्या
राजास जी महाली.....
मला वाटायचं अर्जुनची झोपडी असल्याने त्याला ही कविता जरा जास्तच आवडात असावी. त्याने ही कविता मॅडमकडून पुर्ण लिहून घेतली होती.

क्रमशः

०५ ऑगस्ट, २०११

माझ्या आगामी कादंबरीतून...

पावसाचे दिवस असल्याने रोज कसं अंधारून येत होतं. ढगांची आकाशात जत्रा भरायची. अधून मधून पांढुरके ढगांचे पुंजके एकडून तिकडे पळायचे. मला असं वातावरण खूप आवडायचं. कधी कधी सोसाट्याचा वारा देखील सुटायचा. पावसाचे टप्पोरे थेंब शाळेच्या पत्र्यावर तांडव करायचे. अशा वेळी अभ्यासात लक्षच लागत नव्हतं. खिडकीतून पावसाच्या सरी दिसायच्या. असं वाटायचं समोरच्या वरांड्यात उभं राहून हातात धारा पकडाव्या. काळे सर स्वतः देखील खिडकीजवळ ऊभे राहून पाऊस पहात हरवून जायचे! खिडकीजवळ जायला मिळावं किंवा बाहेर वरांड्यात जायला मिळावं अशी मनापासून ईच्छा होत होती. पावसाचा जोर वाढला. वारा थांबला होता. मागच्या बाजूला पत्रे गळायला लागली, तसा आमचा वर्ग गळकाच होता. मागे मुलांच्या जागेवर आणि सरांच्या टेबलावर गळायचं. एवढं निमीत्त आम्हाला जागेवरून ऊठायला पुरेसं ठरलं. मागे मुलांचा गोंधळ सुरू झाला. मी आणि अनिलनं ऊठून टेबल बाजूला सरकवला आणि तसेच दरवाजाशेजारी ऊभे राहीलो.सरांनी मुलांना पुढे-पुढे सरकायला सांगितलं. सरांचं लक्ष नाही असं पाहून मी बाहेर जाऊन पनाळाखाली हात धरला. हात ओला झाला. अंगातोंडावर देखील पाण्याचे तुषार पडले; लगेच पुन्हा वर्गात आलो, तरी देखील सरांनी पाहीलेच. सर नुसतेच हसले. मग ईतर मुलांनाही थोडा धीर आला.व ते ऊठून खिडकीतून पाऊस पाहू लागले. एक दोघं बाहेर गेले, हळू-हळू सगळा वर्ग वरांड्यात आणि खिडकीजवळ जाऊन ऊभा राहीला.
वर्ग गळका असण्याचा असा देखील फ़ायदा होतो हे आमच्या शिवाय कुणालादेखील कळणारं नव्हतं!
शाळेच्या समोर आणि मागे मैदानावर पावसाचे पाणि वाहू लागले. पाण्याचा रंग चहासारखा झाला. माती मिसळल्याने पाण्याचा रंग बदलला. सर म्हणाले,"बघा पाणी ऊताराच्या दिशेने वहातंय."
एवढं तर आम्हालाही दिसत होतं, परंतु सर काहीतरी.........

क्रमशः
माझ्या आगामी कादंबरीतून...
रघू व्यवहारे,
औरंगाबाद.
०५/०८/२०११

for more details : visit facebook page