२५ डिसेंबर, २०१९

तरुणांचे भावाविश्व उलगडणारी धाडसी मांडणी





































































































तरुणांचे भावाविश्व उलगडणारी धाडसी मांडणी  
'मराठी साहित्यात सहसा आढळणारे अवकाश पकडण्याचे धाडस 'कॉलेज' कादंबरीने दाखवले आहे. तरुणांचे अस्सल भावविश्व रेखाटणारी कादंबरी वाचनीय आहे. मानवी नातेसंबंधाचे प्रवाहीपण अनुभवण्यासाठी कादंबरी वाचली पाहिजे' असे प्रतिपादन समीक्षक डॉ. रामचंद्र काळुंखे यांनी केले
रघुनाथराव व्यवहारे लिखित 'कॉलेज' या कादंबरीचे ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. मराठवाडा साहित्य परिषदेच्या सभागृहात रविवारी कार्यक्रम झाला. यावेळी  . भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, ज्येष्ठ समीक्षक प्रा. चंद्रज्योती मुळे-भंडारी, अभ्यासक डॉ. रामचंद्र काळुंखे आणि शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. कादंबरीवर डॉ. काळुंखे यांनी भाष्य केले
'आपला अवकाश पकडण्याचे धारिष्ट्य मराठी साहित्यात नाही. मात्र रघुनाथराव व्यवहारे यांनी 'कॉलेज' कादंबरीत हे धाडस दाखवले. प्रकृतीला मानवणारे आणि निखळ करमणूक करणारे साहित्य वाचावे अशा वातावरणात वाचक घडतो. त्यामुळे 'कॉलेजकादंबरीची भाषा कदाचित अंगावर येऊ शकेल. औरंगाबाद शहरातील महाविद्यालयाच्या अवकाशावर कादंबरी उभी आहे. बालपण आणि प्रौढ वयापेक्षा तारुण्य प्रवाही असते. कुटुंब आणि जातीधर्माच्या मर्यादा ओलांडून तरुण नवे नातेसंबंध तयार करतात. कारण माणसाची सामाजिक ओढ कायम असतेया नाते बांधणीतून माणसाचे अनुभव अधिक घडतात. जगातील चळवळी आणि नेतृत्व  तरुणांनी केले आहे. सामाजिक वर्तुळातून  बाजूला पडलेला माणूस संकुचित वर्तुळात अडकतो. या पार्श्वभूमीवर तरुणांचे भावविश्व रेखाटणारी 'कॉलेज' कादंबरी उठावदार वाटते', असे काळुंखे म्हणाले.
ज्येष्ठ समीक्षक चंद्रज्योती भंडारी-मुळे म्हणाल्या, "कॉलेज या कादंबरीत व्यवहारे यांनी तारुण्यातील मंतरलेला काळ उभा केला आहेछोट्या छोट्या प्रसंगातून पात्राना जीवंत केले आहे. 'मैत्रभाव' ही  या कादंबरीचा जमेची बाजू आहे. कमालीची ओघवती भाषा हे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. नायकांमधील चांगुलपणा जीवंत असल्याच्या खुणा अतिशय तरलपणे व्यक्त झाल्या आहेत. कादंबरीचा शेवट शोकात्म असला तरी त्याची चाहूल सुरुवातीला कुठेच लागत नाही; आणि म्हणूनच स्वप्नांच्या जगातून वास्तव जगातला हा प्रवेश चटका लावणारा ठरतो
प्राचार्य रा. रं बोराडे म्हणाले,"कॉलेज विश्वात घडणार्या गोष्टी लिहिणे आणि त्यात रसिकांना गुंतवून ठेवणे फार अवघड असते. पण रघुनाथराव  व्यवहारे यांनी या तरल भावना फार चांगल्या पद्धतीने मांडल्या आहेत. “ 
'कॉलेज' कादंबरीचे लेखक रघुनाथराव व्यवहारे मनोगत व्यक्त करतांना म्हणाले,"माणूस म्हणून आनंदाने जगायला प्रेमाची नितांत गरज असते. आजूबाजूची दुनिया प्रेमाला लपवू आणि दडपू पाहतिये असं लक्षात आलं आणि मला आठवलं ते ते सुंदर वळण!
  तारुण्य म्हणजे भरभरून जगण्याचा काळ असतो. सगळी सुख: उपभोगण्याचा काळ असतो. व्यवहारी जगातील कठोर, विदारक रुक्षपण आणि ढोंगीपणा जवळपासही असत नाही. बिनधास्तपणे जगण्याचा हा काळ आणि त्यात वाट्याला आलेले हे इंद्रधनुषी रंग. अत्यंत मनमोहक पाडाव. जिथून हलायलाच नको होतं. अशी भावना मनात घर करत होती. मग डोळ्यासमोर उभे राहिलेत ते कॉलेजचे दिवस 
वाचकांना कॉलेजच्या वयात घेऊन जावं. त्यांनाही यातला कुठला तरी भाग हा आपल्या आयुष्यात घडला आणि त्यांनी काही काळ का होईना पुन्हा 'वयात यावं', पुन्हा पुन्हा त्या आनंदी आठवणीत जगावं हा शुद्ध हेतू तर होताच त्यासोबत तो काळ पुन्हा जगायचा होता मला. त्या वयातील जाणीवा, स्वत:चं विश्व, सामाजीक घटनांकडे पाहण्याचा दृष्टीकोन, आपल्याच विश्वात रममान होणं, प्रेमात पडणं,  मित्राचं आयुष्यातील स्थान. सतत 'मी' भोवती फिरणारं मन, चंचलपणा,  निर्व्याज मैत्री, फुलपाखरासारखं बागडणं, थोडा अवखळपणा, विषमलिंगी आकर्षण,  काय नसतं त्या वयात! प्रत्येक क्षण भारून टाकलेला असतो
अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य ठाले पाटील म्हणाले की, "कॉलेज ही कादंबरी वाचकाला जखडून ठेवणारी आणि शोकांत कादंबरी असल्याने, पार मन हेलावून सोडते. शेवट मनाला चटका लावून जातो. रघुनाथराव व्यवहारे यांनी एकांकिका लिहिल्या आहेत, आता त्यांनी  नाटक लिहावे. मराठवाड्याच्या नाट्य चळवळीला ती पूरक बाब ठरेल आणि मराठी साहित्यालाही वेगळी नाटकं मिळतील असा मला विश्वास वाटतो." मोठया संख्येने रसिक श्रोते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाखा नांदगावकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन मंजुषा जगताप-दुसाने ह्यांनी केले. 

for more details : visit facebook page