आमच्याकडे दोन बैल जोड्या होत्या. त्यातली एक जोडी बाबांची खूप लाडकी. त्यांची नावं सायब्या- हावश्या. या सायब्या हावश्यांना कधीच कासरा लावला नाही. ते सारखे सगळ्या शेतात बाबांच्या मागे मागे फ़िरायचे. बांधाने चरायचे, पण कधीच चुकूनसुद्धा पिकाला तोंड लावायचे नाही. सगळ्यांना आश्चर्य वाटायचं, बाबा त्यांना खूप खूप जीव लावायचे. त्यांच्या प्रेमामुळेच ही जनावरं इतकी मानसाळली होती. बाबा दिसले नाही तर तर ते वेडेपिसे होत. सारखे ओरडत. बाबा आले की अगदी धावत धावत त्यांच्याकडे जात, त्यांचा हात जिभेने चाटायचे. मग बाबा देखील त्यांच्या अंगावरून हात फ़िरवायचे; मानेला खाजवायचे, कपाळावरून हात फ़िरवायचे, कुठे शेपटीला लागलेले लांडग्याचे काटे, गोखरू ईत्यादी काढून टाकायाचे. दर चार दिवसांनी बाबा त्यांना अंघोळ घालायचे; अगदी लहान मुलांसारखीच! दगडाने अंग घासून!
दिसायलाही सायब्या- हावश्या खूप गोंडस! कसं भरीव शरीर, तेलकट चाकलेटी काळपट रंगाची त्वचा, बाकदार शींग. सायब्याच्या कपाळावर पांढरा पट्टा; अगदी गंध लावल्यासारखा! आणि तसाच पट्टा पाठीवर व कानाला. हावश्याच्या अंगावर काळा व पांढरा पट्टा.
आमचा सगळ्यांचाच त्यांच्यावर विशेष जीव! मी तर त्यांच्या पोटाखालून ईकडुन तिकडे जायचो; पण कधी भीती वाटलीच नाही. बाबांच्या अंगाला कुणी झटायला लागलं की सायब्य़ा- हावश्या त्या माणसाच्या अंगावर धावून जायचे. त्यांचाही आमच्यावर विशेषत: बाबांवर खूप जीव!
एकदा असाच पोळ्याचा सण होता. सायब्या हावश्याला आम्ही खूप सजवलं होतं. जवळच तळ्यात नेऊन त्यांना अंघोळ घातली होती. आदल्या दिवशी त्यांची खांदमळनी झाली होती. शिंगाना बेगडं लावली होती. रंगानं रंगवलं होतं; परंतु त्यांच्या रंगामुळे इतर रंग त्यांच्या अंगावर दिसत नसे, फ़क्त पांढ-यावर गोल गोल झाकणाने मारलेले ठसे दिसायचे. अंगावर मस्त घुंगराची, छोट्या मण्यांची झूल असायची. शिंगांना शिंगोळे बसवायचे. गळ्यात मोठमोठ्या घागरमाळा. सगळंच अगदी हौशीने करायचो. दोघांची चाल पण ऎटदार! ईंद्राचा ऎरावत देखील असा चालत नसावा असंच मला वाटायचं!
बाबा त्यांना मारोतिच्या मंदीरासमोर दर्शनाला घेऊन गेले. गावातील इतर बैल सुद्धा आलेले होते. मानाचे तोरण तोडलं होतं. तेवढ्यात डफ़डं वाजायला सुरूवात झाली. आवाजाने बाजुला ऊभे असलेले दोन बैल ऊधळले, तसे ते बाबांच्या अंगावर आले. बाबा मागे सरकतांना खाली पडले. बाबा पडताच हावश्याने त्या बैलांना जोरात टक्कर मारली. सगळीकडे गोंधळ उडाला. ते बैल पळून गेले. बाबा ऊठून बाजुला ऊभे राहिले. सायब्या- हावश्याही जवळ आले. बाबांच्या अंगाला खेटायला लागले. मग बाबा म्हणाले,"अरे काही झालं नाही रे मला..." असं म्हणत त्यांच्या अंगावरून हात फ़िरवला. कदाचीत त्यांना स्पर्शातुन कळलं असावं. ते शांत झाले. सगळे लोक कौतुक करायला लागले. सगळ्यांना आश्चर्य वाटलं होतं.
अश्या कितीतरी घटना आणि प्रसंग घडले होते की, ज्यातुन त्यांनी बाबांवरचं प्रेम व्यक्त केलं होतं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा