१२ मे, २०११

दानवीर कर्ण




चौथ-यावर याचकांची
रांग लागली होती,
कुणास हवे होते सुवर्ण
कुणास पाहीजे मोती!

मुक्त हस्ताने दान दिले
याचक सर्व संपले,
चिंतेने व्याकुळ माता-पिता
वॄषालीसह आत परतले!

इतक्यात आला ईंद्र
दरिद्री ब्राम्हण होऊन,
मुखाचे बोळके चाळविले 
डोळे बारीक करून!

काय हवे ब्रम्हज्ञा?
संकोच नको मागण्या,
कर्णद्वार हे खुले
लौकीक सांगती चांदण्या!

खोटा तुझा हा दंभ
अन खोटा तुझा हा तोरा,
हवे मला जे कर्णा
ऎकुन थरथरेल चौथरा!

ब्राम्हण परतला मागे
अंगराज करी आर्जवे,
मस्तक ठेवीले चरणी
वॄषाली पुसती आसवे!

कवच कुंडले हवीय मजला
हात ब्राम्हणाने पसरले,
अर्जुनाच्या प्रेमासाठी
देवराज ईंद्र याचक झाले!

स्वर्गातील देवांचा राजा
मर्त्यलोकांत आला,
हात पसरूनी ऊभा ईथे
अन दान मागी कर्णाला!

चार दिशांच्या पलीकडची
पाचवी दिशाही हरली,
दिग्विजयी अंगराज कर्णाने
ईन्द्राची झोळी भरली!

कमरेच्या खडगाने
मुखात सारले पाते,
रक्ताच्या कारंज्यात
किर्ती कर्णाची दाटे!

देवेंद्राचे कटीवस्र
रक्ताने माखले,
सुर्यस्त्रोत्र म्हणत कर्णाने
कवच विलग केले!

वॄक्षाच्या सालीसम 
कवच कुंडले काढली,
रक्तवर्णी देह सोलला
ऊष्ण रक्तधारा लागली!

असह्य यातना चौथ-याला
माताही असह्य झाली,
वॄषालीचे दुखः पाहून
भोवळ शोनला आली!

रघू व्यवहारे,
११ मार्च २०११
औरंगाबाद.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

for more details : visit facebook page